
पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा
निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर विचार करण्यासह शोध घेण्याची शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारल्यास समाजाला नवी दिशा देऊ शकतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले.
पडलिहाळ येथील मराठी शाळेचे शतक महोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान उपक्रम स्पर्धेप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून भोज न्यू सेकंडरी स्कूल हायस्कूलचे विज्ञान शिक्षक दिलीप शेवाळे, भूमी वात्सल्य सोशल फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले सलीम नदाफ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. नामदेव चौगुले यांनी, विज्ञानासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अधोरेखित केली. “विज्ञान आणि पर्यावरण यांची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
स्पर्धेत २२ शाळांनी सहभाग घेऊन ६४ विज्ञान उपक्रमांचे सादरीकरण केले. ऊर्जा संवर्धन, जलव्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, सेंद्रिय शेती, पुनर्वापर, विज्ञानाधारित तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग व मॉडेल्सनी सर्वांची मने जिंकली. मुख्याध्यापिका जे. पी. मोरे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आले.
यावेळी एसडीएमसी. उपाध्यक्ष स्वाती पाटील, संजय मगदूम, रवींद्र पाटील यांच्यासह शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश कदम यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta