शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर
निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील कांदा बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिकाम्या गोणीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. १८ ते २० प्रतिकिलो रुपयांच्या दराने कांदा विका लागत असताना, तीच कांदा बारदाण्याच्या गोणीमध्ये भरला जातो. एक रिकामी गोणी तब्बल १० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. यामुळे कांद्याचे पीक घ्यावे की कायमचे सोडून द्यावे?” असा प्रश्न निपाणी सांगलगाव परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
निपाणी भागातील कांदा उत्पादक शेतकरी बंगळूर येथील कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी दरवर्षी कांदा पाठवतात. गेल्या महिन्यांपासून कांद्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहेत. सध्या एक एकर कांद्याच्या पिकासाठी ५० ते ६० हजार रुपयपेक्षा अधिक खर्च येतो. बियाणे, मशागत, खत, औषध फवारणी, मजुरी, पाणी, बीज आणि विहतूक अशा सर्वच बाबीचा खर्च सातत्याने वाढत आहे. मात्र या वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत कांद्याला मिळणारा दर कमीच आहे.
कधी ढगाळ वातावरण, कधी रिमझिम पाऊस, तर कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महागडी औषधे फवारावी लागत असून त्याचा आर्थिक भार वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात हवामानात बदल झाल्याने पावसाची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे कांदा साठवून ठेवण्याऐवजी खराब होऊ नये,यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कमी दराने कांद्याची विक्री केली. या काळात आवक वाढल्याने दर आणखी घसरले. सध्या बंगलोर कांदा मार्केटमध्ये कांद्याला प्रतिकिलो १६ रुपये इतका दर मिळत आहे. मोजक्या शेतकऱ्यांना १९ ते २१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
——————————————————————–
‘ज्या गोणीमध्ये कांदा भरला जातो. त्या रिकाम्या गोणीचा दर वाढला आहे. त्यामुळे कांदा विक्री करताना शेतकऱ्यांना कांदा स्वस्त, गोणी महाग, या अन्यायकारक गणिताचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला असून भविष्यात कांद्याचे पीक घ्यायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
-रघुनाथ चौगुले, कांदा उत्पादक शेतकरी सौंदलगा
Belgaum Varta Belgaum Varta