
मागणीनुसार पुरवठा कमी
निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातून आंब्याची आवक सुरू होत होती. पण यावर्षी गुढीपाडव्याला आंबा पाहायला सुद्धा मिळाला नाही. पाडवा संपल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी कोकणातून निपाणी बाजारपेठेत फळांच्या राजा असलेल्या हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. सध्या बाजारात प्रति डझन ९०० ते १५०० डझन याप्रमाणे खरेदी विक्री प्रारंभ झाली आहे.
येथील महात्मा ज्योतिबा फुले फळ, भाजीपाला मार्केटमध्ये फळांच्या राजाची आवक होत आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त मोठी आवक होईल असे चित्र होते. परंतु वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे यंदा एक महिना उशिरा आंबा दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यात अत्यंत कमी आवक झाल्याने दर वाढीव आहेत. त्यामानाने मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रत्नागिरी हापूस बाजारात असला तरी देवगड, पायरी, केशर आंबे अद्याप बाजारात आलेले नाहीत. त्यांची आवक सुरू होताच हापूस आंब्याचे दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे. यंदाच्या तुलनेत गतवर्षी आंब्याची चांगली आवक होऊन दरही परवडण्यासारखे होते. पण आता दरात मोठी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यापासून कर्नाटकातील आंबा निपाणी बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—————————————————————–
‘सध्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने दर चढे आहेत. परिसरातील ग्राहकाकडून कमी जास्त दराने त्याची खरेदी सुरू आहे. आवक वाढल्यास दर उतरण्याची शक्यता आहे.’
-सर्फराज कुन्नूरे,
आंबा विक्रेते, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta