
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील एल.पी.जी. गॅस पंपावरील गॅसचा वाढीव दराच्या विरोधात शनिवारी (ता.४) तहसीलदार सुरेश मुंजे यांना निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. शिवाय हा दर पूर्वीप्रमाणे ठेवण्याची मागणी केली.
निवेदनातील माहिती अशी, केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एल.पी.जी. गॅसचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही प्रत्यक्षात निपाणी शहरामध्ये वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील एल.पी.जी. गॅस पंपावर मनमानी कारभार सुरू असून विनाकारण गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून संबंधित गॅस पंप बंद ठेवण्यात आल्यामुळे रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा कर्जावर घेतलेल्या असून दरमहा बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्यावर आधीच आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत गॅसच्या दरवाढीमुळे आणि पंप बंद असल्यामुळे त्यांचे उत्पन्न ठप्प झाले आहे.
या सर्व समस्यांचा विचार करून तहसीलदारांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित गॅस पंपाची चौकशी करून गॅसचे दर कमी करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शहर रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर खराडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रिक्षा चालक संजय तिप्पे, युवराज प्रताप, भाऊ भाट, रामचंद्र खडके, सुनील वाडेकर, उत्तम खराडे, अनिल वाडेकर, संजय चौगुले, भिमराव चव्हाण, संजय भोपळे, इम्रान उस्ताद यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta