
तहसीलदार सुरेश मुंजे; निपाणीत ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे योग्य दिशा आणि शांत अभ्यासाचे वातावरण मिळत असल्याचे मत तहसीलदार सुरेश मुंजे यांनी व्यक्त केले. येथील ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करून तहसीलदार मुंजे बोलत होते.
प्रारंभी तहसीलदार सुरेश मुंजे व पालिका आयुक्त गणपती पाटील यांच्या हस्ते अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. देवेंद्र घस्ते तर प्रा. सुरेश कांबळे यांनी प्रस्तावित केले. प्रा. जे. डी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि वाचन संस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित करुन ग्रंथालय हे ज्ञानसमृद्धीचे केंद्र असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. अच्युत माने यांनी, निपाणी सारख्या शहरात अशा दर्जेदार अभ्यासिका सुरू केल्यास येथून शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून घडणार असल्याचे सांगितले. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोककुमार असोदे, प्रा. जे. डी. कांबळे, प्रा. डॉ. अच्युत माने यांनी मनोगत व्यक्त केले. अभ्यासिका केंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. उपस्थितांचा फुलाची रोपे देऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास प्रा. डॉ. आर. के. दिवाकर, रमेश जयकर, प्रा. डॉ. प्रा. एन. डी. जत्राटकर, डॉ. सिद्धगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रणीत घस्ते यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta