Monday , December 8 2025
Breaking News

बहुजन समाजाने संघर्ष करण्याची गरज!

Spread the love

श्रीकांत होवाळ : बहुजन क्रांती मोर्चातर्फे संमेलन
निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सामान्य व्यक्तीलाही व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे. याची आठवण करून देताना सध्याच्या काळात कुणीच काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे सरकार निर्ढावले आहे. असलेल्या व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंम्मत ठेवा, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी व्यक्त केले. निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल मैदानावर रविवारी सायंकाळी बहुजन क्रांती मोर्चातर्फे महापुरुषांची सामूहिक जयंती व तालुकास्तरीय महासंमेलन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्रीकांत होवाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यासारख्या अनेक महापुरुषांनी समाजातील जतीभेद संपविण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. मात्र सध्या केंद्रातील भाजपचे सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात जातीभेदाचे विष पेरण्याचे काम करत आहे. त्यामुळे तो प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यासाठी महापुरुषाच्या विचारधारा समोर ठेवून बहुजन समाजाने संघर्ष करणे ही काळाची गरज आहे.
काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात सर्वाधिक दंगली काँग्रेसच्या कार्यकाळात झाल्या. देशात ओबीसींचे २०० खासदार आहेत. मात्र कोणीही ओबीसींच्या प्रश्नावर बोलत नाही. देशातील हे केंद्र सरकार बहुजनांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असून केवळ मतांसाठी बहुजनांचा वापर करून घेत असल्याची टीका त्यांनी केली.
बहुजन मुक्ती पार्टीचे बेळगाव जिल्हाध्यक्ष जरारखान पठाण यांनी निपाणीत आपणास अनेक कार्यक्रम करताना प्रशासनाने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली.
बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब जाधव म्हणाले, निपाणी सारख्या परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास असणाऱ्या शहरात मुस्लिम समाजाकडून डॉ. आंबेडकर जयंती साजरी होणे ही कौतुकास्पद बाब आहे. अशा कार्यक्रमांना जर प्रशासन आडकाठी आणत असेल तर तो संविधानाचा अपमान आहे, असे सांगितले. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवक्ता गौरव पनोरेकर यांनी, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात आडकाठी आणणाऱ्या प्रशासनावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
प्रारंभी निपाणी पालिकेजवळील डॉ. आंबेडकर उद्यानापासून शहरात विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत झेंडे घेऊन अनेक नागरिक सहभागी झाले होते. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी नागराज जयकर, अमजदअली मुजावर, अशोक लाखे, सुनिल लाखे, आकाराम एडनाईक, सुरज हेगडे, सचिन मधाळे, अबिद पकाली, प्रथमेश काबळे, नितीन कांबळे यांच्यासह बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
—-
आठवलेचे मंत्रीपद नावालाच
रामदास आठवले हे केद्रात सामाजिक न्यायमंत्री आहेत. बहुजन समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांचे मंत्रीपद नावालाच असल्याची टिका होवाळ यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *