जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग
निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष, कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
बोरगाव जैन मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, आचार्य श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांच्या प्रथम शिष्या गणीनी प्रमुख, आर्यिकारत्न 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिका रत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचे 41 वा चातुर्मास या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे गुरुपौर्णिमा, वीर शासन जयंती, नागपंचमी पार्श्व पंचमी, भगवान पार्श्वनाथ मोक्ष कल्याणक, रक्षाबंधन, शोडशकारण वृतारंभ, आचार्य शांतीसागर महाराज पुण्यतिथी, दशलक्षण व्रतारंभ, विजय दशमी, भगवान महावीर निर्वाण कल्याण, यासह दैनंदिन भक्ती पाठ, अभिषेक, पूजा, शांतीधारा, स्वाध्याय, आहारचर्या, सामायिक, भक्तामर अनुष्ठान, प्रवचन, शंका समाधान, रत्न करंडक श्रावकाचार, प्रतिक्रमण आरती, विशेष प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, श्रावक रत्न, रावसाहेब पाटील दादा व मीनाक्षी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माताजींचा चातुर्मास कार्यक्रम होत आहे. चार महिने चालणार्या या चातुर्मास कार्यक्रमात समाजात जैन धर्माची जनजागृती करण्याबरोबरच युवकांमध्येही समाज प्रेम, देशप्रेम वाढावे, यासाठी विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. यानिमित्त कलश स्थापना कार्यक्रम येथील आदीसागर जैन गुंफा येथे होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही उत्तम पाटील यांनी केले.
याप्रसंगी श्रावकरत्न रावसाहेब पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, अभय करोले, अभयकुमार मगदूम, बाळासाहेब पाटील, कुमगौडा पाटील, महावीर पाटील, अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब भोजकर, राजू पाटील, बाळासाहेब हावले, राकेश फिरगन्नवर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.