अतुलशास्त्री भगरे -गुरुजी : निपाणीत आयुर्वेद चिकित्सा शिबिर
निपाणी (वार्ता) : मानवाला निसर्गाने आजपर्यंत बरेच काही दिले आहे. पण त्याचा उपयोग घेताना निसर्गाची किंमत मानवाने ठेवलेली नाही. आपल्या सुख सोयीसाठी तो निसर्गावरच मात करत असल्याने भूतलावर अनेक रोगराई व समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना सारख्या महामारीने मानवाला निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख करून दिली आहे. निसर्गामुळेच मानवनिरोगी व दीर्घायुषी बनतो, असे मत पंडित अतुलशास्त्री भगरे -गुरुजी यांनी व्यक्त केले केले. येथील राजमाता जिजाऊ फाउंडेशन, शिव संकल्प आध्यात्मिक प्रतिष्ठान व नाशिक येथील गुरुजी आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जुन्या पिढीतील आयुर्वेदाचार्य मच्छिंद्रनाथ चिकोडे व ज्योतिषाचार्य गोरखनाथ चिकोडे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर पार पडले. त्यावेळी भगरे गुरुजी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरीलमान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी स्वागत केले.
भगरे गुरुजी यांनी माणसाने दैनंदिन आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्नाप्रमाणेच वृत्ती आणि प्रवृत्ती होते हे लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमुळे शरीराबरोबरच मानसिक आजारही बरे होत असल्याचे सांगितले. निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रुग्णांनी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास प्रा.डॉ. अच्युत माने, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, शहर भाजप अध्यक्ष प्रणव मानवी, श्रीमंत विजयराजे देसाई सरकार, सलीम मुल्ला, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. व्ही. अरमानी, समाधान कुलकर्णी, दीपक जोशी, डॉ. शिरीष गाणे, चंद्रकांत जोशी शामजी पाठक, ओंकार घोडके, किरण कोकरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यशोधन तारळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta