वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थातून तीव्र नाराजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप
हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याची मागील कित्येक महिन्यापासून प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासी वर्ग अक्षरशः मेटामेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून देण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गातून होत आहे.
हंचिनाळ ते कोगनोळी हा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता मागील कित्येक महिन्यापासून प्रचंड खराब झाला असून रस्त्यावरचे डांबरीकरण. खडी उखंडून गेल्यामुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने घसरून आत्तापर्यंत कित्येक लहान मोठे अपघात झाले आहेत.
शिवाय सदर रस्त्यावरून हंचिनाळसह बेनाडी, शिवापुर वाडी, आणि जैनवाडी जत्राट आदी गावातील ग्रामस्थांना कागल कोल्हापूरला जोडणारा जवळचा मार्ग आहे. शेकडो कामगार कागल औद्योगिक वसाहतीला दररोज ये-जा करीत असतात. हंचिनाळमधून शालेय विद्यार्थी कोगनोळी कागलकडे नियमित प्रवास असतो. त्यामुळे हा रहदारी असणारा रस्ता असल्यामुळे सदर रस्त्याची त्वरित डांबरीकरण होण्याची आवश्यकता आहे. सदर अत्यंत खराब रस्त्यामुळे कागल हंचिनाळ या मार्गावर असणाऱ्या बस फेरी फक्त दिवसातून एकच शिल्लक राहिली आहे. परंतु या समस्येकडे लोकप्रतिनिधीसह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची चर्चा ग्रामस्थातून चर्चेली जात आहे. मागील काही महिन्यापासून लेखी व तोंडी निवेदन ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत.
यासंदर्भात सदर रस्ता मंजूर असल्याचे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात कामाला कधी सुरू होणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबासो पोवार बापू म्हणाले की, सदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी व वाहनधारकांच्या हिताच्या दृष्टीने त्वरित रस्ता सुरू होण्याची आवश्यकता आहे. रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यास सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याचे सांगितले.