सांगोल्याच्या ७५ वर्षीय वृद्धेला जीवदान : डॉ. एम. डी. दीक्षितसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक
निपाणी (वार्ता) : कर्नाटकतील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. ‘टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लान्टेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची खराब झालेली महारोहिणीची झडप बदलण्यास मदत होते. येथील अरिहंत हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित, डॉ. अनमोल सोनवे, डॉ. प्रभु हलकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करणे शक्य झाले आहे. ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लांटेशनमध्ये रुग्णाच्या पायातील रक्तवाहिनीद्वारे महारोहिणीत (धमनी) नळी टाकण्यात येते. महारोहिणीच्या झडपेपर्यंत नेऊन त्याद्वारे झडप मोठी करून नवीन झडप बसविण्यात येते. फक्त पिन होल म्हणजेच १.५ ते २.० सें.मी छिद्राद्वारे आपण झडप बदलतो. प्रामुख्याने रुमॅटिक हार्ट ते संधीवातामुळे होणारे झडपांचे आजार व वयोमान वाढल्याप्रमाणे कॅल्शियम आणि फायब्रोसिस यामुळे होणारे आजार अशा दोन पद्धतीच्या झडपांचे आजार आढळून येतत. आज झडपांचे आजार वाढल्यामुळे ती झडप ओपन हार्ट सर्जरीद्वारे बदलणे शक्य आहे. मागील दहा वर्षांमध्ये महारोहिणीची जी झडप आहे, त्या झडपेचा आजार आज कोणतीही ओपन हॉर्ट सर्जरी न करता एका छोट्याशा नळीद्वारे झडप बदलता येऊ शकते. मागच्या दहा वर्षात हे तंत्रज्ञान फार चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहे. सुरुवातीला ज्यांचे हृदय व्यवस्थित काम करत नाही, ज्यांना बरेच आजार आहे, अशा रुग्णांमध्ये पिन होल सर्जरी व वॉल्व बदलणे शक्य होत असे. आज नवीन तंत्रज्ञान, नवीन कॅथेटर, नवीन झडप, आकार कमी झाल्यास महारोहिणीची झडप नळीद्वारे बदलता येते, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
ही प्रक्रिया पायाच्या धमनी (ग्रोईन वेसेल्स) द्वारे केली जाते. परंतु महिलेच्या पायाच्या धमन्या खूपच लहान होत्या. त्यामुळे डॉक्टरांकडून कॅरोटीड आर्टरी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) द्वारे शस्त्रक्रिया हा पर्यायी मार्ग वापरला गेला. या शस्त्रक्रियेसाठी ७५ वर्षे वय असूनही महिलेने कोणतेही दडपण न घेता योग्य तो प्रतिसाद दिला. दरम्यान आजपर्यंत अशाप्रकारची भारतात कॅरोटीड आर्टरी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) द्वारे एकच शस्त्रक्रिया झाली होती. आता दुसरी शस्त्रक्रिया बेळगावमधील अरिहंत हॉस्पिटलमध्ये पार पडली असून कर्नाटकातील अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ४८ तासांत महिलेला डिस्चार्ज देण्यात आला असून सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रातील सांगोला शहरातील एका ७५ वर्षीय सिंधूबाई हरिभाऊ पोरे या महिलेवर तब्बल एक ते दीड तास आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले. सदर महिलेला श्वासोच्छवासाचा मोठा त्रास होत होता. मात्र सदर महिलेवर ओपन हार्ट सर्जरी करणे धोक्याचे होते. ही बाब ध्यानात घेऊन डॉ. अनमोल सोनवे, डॉ. एम. डी. दीक्षित, डॉ. प्रभु हलकट्टी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अंबरिश नेर्लीकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने कर्नाटकातील पहिली व भारतातील दुसरी टावी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
याबाबत डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, अशा प्रकारची शस्रक्रिया समाजासाठी वरदान आहे. शस्त्रक्रियेसाठी जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना आता मोठ्या महानगरात जाऊन उपचार घेण्याची गरज नाही. बेळगाव येथे अरिहंत हॉस्पिटलमध्ये ही जीवनरक्षक शस्त्रक्रिया प्रदान करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत असून याद्वारे आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील रुग्णांना ही जीवनरक्षक सुविधा देऊ शकणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
——————————————————————
हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक
अरिहंत हॉस्पिटलचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व संचालक अभिनंदन पाटील यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करून तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच या शस्त्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta