संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेच्या अन्यायकारक पाणीपट्टी विषयी प्रथम काँग्रेसने आवाज उठविला आहे. गेल्या 21 एप्रिल 2021 पासून आम्ही वाढीव पाणीपट्टी विरोधात लढा देत आहोत, असे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, विनोद नाईक, चिदानंद कर्देण्णावर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, संकेश्वरात 24×7 योजना कार्यान्वित नसली तरी मुख्याधिकारी जगदीश ईटी मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी आकारणी करताहेत. हे पूर्णत: चुकीचे आणि लोकांवर अन्यायकारक ठरले आहे. 24 तास पाणीपुरवठा केला जात नसताना मिटर रेडिंगनुसार बिल आकारणी कशासाठी? याचे समर्पक उत्तर ईटी यांच्याकडे नाही. मुख्याधिकारी जगदीश ईटी हे भाजपाचे एजंट म्हणून काम करताहेत. 2013 पर्यंत पालिकेची पाणीपट्टी वर्षाला 960 रुपये होती. 2016 ते 2020 अखेर पाणीपट्टी 1560 रुपये होती. 2021 पासून 24×7 पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ईटीसाहेब चक्क लोकांची लुबाडणूक करताहेत. संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने वार्षिक पाणीपट्टी 2 हजार रुपये आकारणीचा ठराव संमत केला आहे. त्याची अंमलबजावणी मुख्याधिकारींनी केली नाही तर काँग्रेसतर्फे आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे नेते अविनाश नलवडे, महेश हट्टीहोळी, प्रशांत कोळी, तबरेज हजरतभाई, कुमार कब्बूरी रुपसिंग नाईक उपस्थित होते.
पवन कत्ती कोण?
चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी हे भाजपाचे एजंट बनले आहेत. पालिकेच्या कार्यक्रमाला पवन कत्ती यांना बोलावून ते शिष्टाचाराचे उल्लंघन करीत आहेत. पालिकेच्या विकास कामांच्या कार्यक्रमात मंत्री उमेश कत्तीं सहभागी झाले तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/01/sankeswar--660x330.jpg)