संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारने गोंधळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तातडीने कुलशास्त्र अध्ययनाची सुरुवात करुन गोंधळी समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक गोंधळी समाज हुक्केरी तालुका घटकचे अध्यक्ष परशराम शिसोदे यांनी संकेश्वर विश्रामधाम येथे पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, मागील येडियुराप्पा सरकारने अलमारी-आलेमारी समाजाच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र 5 कोटी रुपयेच मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी उर्वरित निधी मिळवून देण्याचे कार्य करायला हवे आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात भटक्या गोंधळी, वासूदेव, बुडबुडकी जोशी, अशा 46 मागासवर्गीय समुदायसाठी कर्ज योजना घोषित केली आहे. प्रत्यक्षात अद्याप कर्ज योजनेची अंमलबजावणी केली गेलेली नाही. सरकारने भटक्या गोंधळी बुडबुडकी वासूदेव जोशी समाजासाठी कुलशास्त्र अध्ययनाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. सरकारने आलमारी समाजातील मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करावी. बेघर लोकांना घरे मिळवून देण्याचे कार्य करावे. आलमारी समाजातील लोकांना मोफत बसपास, आरोग्य कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा उत्पन्नाचा दाखला मिळवून देण्याबरोबर सरकारने आपल्या वार्षिक अंदाजपत्रकात गोंधळी समाजाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोंधळी समाज तालुका सचिव अरुण गोंधळी, संघटक बाळासाहेब गोंधळी, जिल्हा संघटक संदिप गोंधळी, संकेश्वर समाज कमिटी अध्यक्ष मुरलीधर दवडते, संकेश्वर अंबिका गोंधळी समाज अध्यक्ष तानाजी कळीवाले आदी उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/12/gondali-samaj-660x330.jpg)