बंगळूर : कर्नाटकात हलाल मांस विरोधी मोहिमेनंतर आता बजरंग दल आणि श्रीराम सेना आदी संघटनांनी मशिदीत लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही हिंदू गट अजान दरम्यान ‘ओम नमः शिवाय’, ‘जय श्री राम’, ‘हनुमान चालीसा’ पठण आणि इतर भक्ती प्रार्थना प्रसारित करण्याची योजना आखत असल्याचे समजते. या सर्व प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत.
यावर भाजपचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी, मुस्लिम समुदायाला विश्वासात घेऊनच या समस्येवर कोणताही तोडगा काढता येऊ शकतो असे म्हटले आहे. ते म्हणाले की, मुस्लिम समुदाय अजान दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर करण्याची प्रथा खूप पूर्वीपासून पाळत आहे. पण लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे विद्यार्थी, मुले आणि रुग्णांना त्रास होत आहे. मुस्लिमांनी नमाज अदा करण्यावर माझा आक्षेप नाही, पण जर मंदिरे आणि चर्चमध्येही अशाच प्रकारे लाऊडस्पीकरचा वापर करुन प्रार्थना केली जात असेल, तर त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
कॅबिनेटमधील ईश्वरप्पा यांचे सहकारी सी. एन. अश्वथ नारायण यांनी म्हटले आहे की, सरकारने अजान संदर्भात कोणताही नवीन कायदा आणलेला नाही. आम्ही कायद्यातील नियमांनुसार काम करत आहोत. आम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरोधात काम करत नाही.
यावर बजरंग दलाचे सदस्य भरत शेट्टी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मशिदींतील लाऊडस्पीकर विरोधातील मोहीम बंगळुरातील अंजनेय मंदिरातून सुरू होईल आणि त्यानंतर ही मोहीम राज्यभर चालवली जाईल.
श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी म्हटले आहे की, सकाळी 5 वाजता लाऊडस्पीकरचा वापर बंद करण्यासाठी अधिकार्यांना निवेदन दिले होते. पण बेळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आमचा प्रार्थनेला विरोध नाही. पण लाऊडस्पीकरच्या वापराला आमचा विरोध आहे. जर मशिदींतील लाऊडस्पीकर काढले नाहीत तर आम्ही रोज सकाळी भजन म्हणू, सर्वोच्च न्यायालयाने दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
Check Also
बिदरमध्ये सशस्त्र दरोडेखोरांकडून दोन सुरक्षा रक्षकांची हत्या
Spread the love एटीएमसाठी आणलेली ९३ लाखांची रोकडही लुटली बंगळूर : बिदरच्या जिल्हा मुख्यालयातील एसबीआय …