
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ११९ व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम
बंगळूर : शिवकुमार स्वामींसारखे संत समाज आणि राष्ट्राच्या आत्म्याला आकार देतात आणि त्यांच्या देहावसानानंतरही त्यांची आध्यात्मिक परंपरा देशाला सतत पोषण देत राहते, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सांगितले.
सिद्धगंगा मठाचे प्रमुख असलेले शिवकुमारस्वामी यांना ‘त्रिविध दासोही’ म्हणून ओळखले जात होते. अन्न, निवारा आणि शिक्षण या तीन सेवांमुळे त्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला. २१ जानेवारी २०१९ रोजी १११ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
श्री सिद्धगंगा मठ येथे त्यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “शिवकुमार स्वामीजींचे जीवन गरिब आणि वंचितांच्या सेवेसाठी अर्पण झाले होते. त्यांच्या कार्यातून आध्यात्मिकतेचा समाजकल्याणाशी असलेला संबंध अधोरेखित होतो.” त्यांनी पुढे सांगितले की, परिश्रम, लोकसेवा आणि राष्ट्रसेवा या परस्परांशी जोडलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आध्यात्मिकता मजबूत पाया प्रदान करते.
मठाच्या कार्याचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत अन्न, निवास आणि शिक्षण देण्याची व्यवस्था अत्यंत प्रशंसनीय आहे. “शिक्षण हे विकासाची किल्ली आहे. गरिबांना शिक्षण देणे म्हणजे देशाचे भविष्य घडवणे,” असे त्या म्हणाल्या.
प्राथमिक शिक्षणापासून अभियांत्रिकी व व्यवस्थापनापर्यंत विविध शैक्षणिक संस्था मठाने उभारल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, मठाशी संबंधित रुग्णालयामार्फत उत्कृष्ट आरोग्यसेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
१२व्या शतकातील समाजसुधारक बसवण्णांच्या विचारांचा उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भेदभावमुक्त समाज आणि लोकसहभागावर आधारित लोकशाहीची संकल्पना त्यांनी शतकांपूर्वी मांडली होती आणि सिद्धगंगा मठ त्याच आदर्शांचे पालन करत आहे.
कर्नाटक राज्याचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, सार्वजनिक सेवा, राष्ट्रसेवा, आध्यात्मिकता आणि आधुनिक प्रगती यांचा उत्कृष्ट संगम या राज्याने दाखवून दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवकुमार स्वामींना अभिवादन करत त्यांच्या शिक्षण, समाजकल्याण आणि आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले. “त्यांचे जीवन करुणा, नम्रता आणि मानवसेवेचे प्रतीक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शेवटी, राष्ट्रपती मुर्मू यांनी नागरिकांना आवाहन केले की, राष्ट्रनिर्माण, परोपकार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालूनच शिवकुमार स्वामींना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल.
Belgaum Varta Belgaum Varta