Saturday , July 27 2024
Breaking News

राज्याच्या हिताविरोधात असणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करणार : मुख्यमंत्री बोम्माई

Spread the love

बेळगाव (वार्ता) : बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता मोजवण्याचे काम म. ए. समिती करत आहे. म. ए. समिती राज्याच्या विरोधात कारवाया करत आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या हिताचा विरोधात काम करणार्‍यांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज सोमवारी विधानसभेत बोलताना दिली.
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा तर अनगोळ येथील संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबना प्रकरणावरून सोमवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेसचे आमदार डी. के. शिवकुमार यांच्यासह सत्ताधारी भाजपचे आमदार येडियुराप्पा, मंत्री ईश्वरप्पा, आम. बसवराज पाटील यत्नाळ, निधर्मी जनता दलाचे आम. के. अन्नदानी, शिवलिंगेगौडा, जी. टी. देवेगौडा यांनी संगोळी रायण्णा पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरले. बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज व अनगोळ येथील संगोळी रायण्णा पुतळा अवमान प्रकरणानंतर बेळगाव शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीला ही समिती कार्यकर्त्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांनी केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव सीमाभागातील जनतेचा विश्वास गमावला आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी म. ए. समिती बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता निर्माण करत आहे. त्यामुळे अशांतता माजविणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीवर देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी. अशांतता माजविणार्‍या कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात यावे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या षडयंत्र मागे असणार्‍यांची चौकशी केली जावी. महाराष्ट्रात कर्नाटकाचा ध्वज जाळण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी करावी. बेळगाव सीमाभागातील अशांतता माजविणार्‍या संदर्भात केंद्राला माहिती कळविण्यात यावी अशी मागणीही सभागृहातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी केली.
सीमाभागात म. ए. समितीचे अस्तित्व संपुष्टात, त्यांना तडीपार करा
दरम्यान, बेळगाव महापालिकेत केवळ तीन नगरसेवक आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अवस्था दयनीय झाली आहे. बेळगाव सीमाभागातील जनतेने त्यांना नाकारले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव आणि सीमाभागातील अस्तित्व संपुष्टात आले आहे, अशी वल्गना भाजप आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी तर महाराष्ट्र एकीकरण समिती भित्र्यांची संघटना आहे. बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता माजविणार्‍या म. ए. समितीवर बंदी आणतानाच, समितीला तडीपार करा, अशी वल्गना विधानसभेत केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच अनगोळ येथील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात धुमशान माजले आहे. दोन्ही राज्यातील या वादाचे पडसाद आज सोमवारी विधानसभेत उमटले. बेळगावात निर्माण झालेल्या तणावाला महाराष्ट्र एकीकरण समिती जबाबदार असल्याचा ठपका ठेवत सभागृहातील सत्ताधारी भाजप त्याचबरोबर विरोधी पक्षातील काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी एकच कोलाहल माजविला. सदनातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर टीकेची झोड उठवताना समितीवर बंदीची आग्रही मागणी केली. समिती देशद्रोही आहे. बेळगाव अधिवेशन काळात अशांतता माजविण्याचे षडयंत्र समिती करत आहे. समिती कार्यकर्त्यांना तडीपार करण्याच्या सूचनाही आमदारांनी केल्या.

About Belgaum Varta

Check Also

माजी सैनिक संघटना संघटनेतर्फे कारगिल विजयोत्सव

Spread the love  बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *