Saturday , July 27 2024
Breaking News

आयटी-बीटी कंपन्यांना होत्या टार्गेट..!

Spread the love

 

संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून माहिती समोर

बंगळूर : व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील बॉम्बरसह दोन संशयित दहशतवाद्यांनी बंगळुरला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणाऱ्या आयटी, बीटी कंपन्यांवर बॉम्बहल्ला करण्याचा कट रचल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आली आहे. अब्दुल मतीन ताहा व मुसावीर हूसेन शाजीब या संशयित दहशतवाद्याना अटक करून एनआयएकडून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
एनआयए अधिकाऱ्यांनी दोन संशयित अतिरेक्यांना शहरातील एका गुप्त स्थळी सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, धक्कादायक माहिती समोर आली असून अधिका-यांनी तपास तीव्र केला आहे.
रामेश्वरम कॅफे येथे बॉम्बस्फोट करणारे, संशयित दहशतवाद्यांचे लक्ष्य प्रामुख्याने हिंदू होते. त्यांनी प्रथम आयटी बीटी कंपन्यांमध्ये बॉम्ब पेरण्याचा कट रचला होता, असे तपासात उघड झाले आहे.
एसएझेड परिसरात अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्या आहेत. हजारो अभियंते काम करत आहेत, इथे स्फोट झाला तर ही कारवाई देश-विदेशात मोठी बातमी होईल, या उद्देशाने हे गुन्हेगार व्हाईटफिल्डच्या अनेक भागात फिरत होते.
पण आयटीबीटी परिसरात बॉम्ब पेरणे तितके सोपे नाही, याची त्याना खात्री पटली. ज्या भागात कंपन्या होत्या त्या भागात उच्च सुरक्षा, सीसीटीव्ही पाळत, मेटल डिटेक्टर होते, यामुळे कंपनीच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करणे इतके सोपे नव्हते. नंतर त्यांनी योजना बदलली आणि त्याच भागात स्फोट घडवण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्याना व्हाईटफिल्डमध्ये रामेश्वरम कॅफे सापडला. आणखी लोक सामील होतील, सॉफ्टवेअर कर्मचारीही येथे येतील. कॅफेमध्ये प्रवेश करण्यास कोणताही अडथळा नाही. सुरक्षा नाही, मेटल डिटेक्टरही नाही. त्यामुळे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी योग्य ठिकाण म्हणून रामेश्वरम कॅफेची निवड करण्यात आली. तसेच याचवेळी राम मंदिराचे उद्घाटनही करण्यात आले, यावेळी कॅफेसमोर जल्लोषही करण्यात आला.
एक मार्च रोजी कॅफेमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणण्यात आला होता. एनआयएने सीसीटीव्ही फुटेजच्या प्राथमिक पुराव्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला. अखेर कोलकाता येथे गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.

दहशतवाद्यांचा सुगावा कसा मिळाला
कोलकाता येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती एनआयएला मिळाली ही बाब निश्चितच विशेष होती. एक मार्च रोजी बंगळुर येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोघेही राज्यातून पळून गेले आणि तामिळनाडू, ओडिशा येथे फिरले आणि पश्चिम बंगालमध्ये गेले. अनेक दिवस भटकंती केल्यानंतर खिसे रिकामे झाले.
हँडलरच्या माध्यमातून त्याच्या बेनामी खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले. एनआयएने संशयितांनी वापरलेल्या खात्याची माहिती गोळा केली होती. त्या आधारे तपास सुरूच होता. अखेर कोलकात्यात पैशांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे तपास पथक कोलकात्यात तैनात होते.
नंतर, लॉजचे लेजर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. बनावट ओळखपत्रे देऊन लॉजमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर छापा टाकण्यात आला व त्याना पकडण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *