आप्पासाहेब महाराजांची भाकणूक : बेनाडीत बिरदेव यात्रा
निपाणी (विनायक पाटील) : पावसाचे प्रमाण कमी जास्त असून अवेळी पाऊस पडेल. त्यामुळे आजार वाढवून मृत्यूची शाश्वती नाही. नवनवीन रोग झपाट्याने वाढतील. खून, दरोडे, चोर्या दिवसेंदिवस चालूच राहतील. साखरेचे दर कमी होऊन गुळाचे दर वाढतील. कोरोना व्हायरस नष्ट होऊन सीमाभाग चर्चेत राहील, असे भाकीत वाघापूर येथील आप्पासाहेब महाराज यांनी व्यक्त केले. बेनाडी येथे बिरदेव यात्रा आणि बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेतील भाकणूकीत त्यांनी वरील भाकीत केले.
शनिवारी(ता.9) रात्री 8 वाजता सिध्देश्वर देवालय येथे वालंग जमवूनन श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रविवारी (ता.10) सकाळी 8 वाजता श्रींच्या पालखीची गजनृत्यमध्ये मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता शंकर देवर्षी आणि सिद्धू बनकर यांचा हेडांब खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वाघापूर येथील भगवान आप्पासाहेब महाराज व सहकार्यांचा भाकणूकीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.
वालंग घेऊन येणार्या प्रत्येक ढोलास 101 रूपये व मानाचा फेटा, देवाची छत्री घेऊन येणार्या संघास एका छत्रीस 125 रूपये बक्षीस देण्यात आले. रात्री महाप्रसादाचे वाटप झाले.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अण्णाप्पा बन्ने अण्णा हजारे, भागोजी बन्ने सत्याप्पा हजारे, पुंडलिक ढवणे, अविनाश हजारे, मायाप्पा बन्ने शिवाजी ढवणे, शंकर जानकर, जक्काप्पा हजारे, कल्लाप्पा भानसे, रवी हजारे, कल्लाप्पा कोरे, संजय हजारे, रवी बन्ने महादेव लवटे, मारुती लवटे, आप्पाजी लवटे, वासू रानगे, शिवराम बोते, विठ्ठल बन्ने, मल्लेश बन्ने यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. सोमवारी (ता.11) रोजी सकाळी करतोडणी करून यात्रेची सांगता करण्यात आली.
Check Also
निपाणीत उरुसाला प्रारंभ
Spread the love धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …