आम आदमी पक्षाकडून सरकारला इशारा
बेळगाव : येत्या तीन दिवसांत बेळगाव महानगरपालिकेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी, अन्यथा महापालिका कार्यालयाला टाळे ठोकू, असा कडक इशारा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला 9 महिने उलटले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौरांच्या निवड झालेली नाही. निवडणूक जिंकली तरी नगरसेवकांच्या हातात सत्ता नाही. त्यामुळे कुंदानगरीचा विकास खुंटला आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणुका घेण्यास सरकारच्या दिरंगाईचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी महापालिकेसमोर निदर्शने केली. तसेच बेळगावातील समस्यांचे पोस्टर आणि बॅनर व किल्ली व कुलुपे हातात घेऊन त्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या नगरसेवकांना सांगितल्या तर ते आमच्या हातात सत्ता नाही असे सांगत हात वर करतात. नगरसेवक असतानाही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी एकत्र येऊन 470 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सरकारी अधिकारीच सरकार चालवत असतील तर मुख्यमंत्री कशाला हवा..? सरकारच्या मुख्य सचिवांना अधिकाराचा वापर करू द्या. येत्या तीन दिवसांत महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुका न घेतल्यास महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. अनिस सौदागर आणि आम आदमी पक्षाचे इतर नेते आंदोलनात सहभागी झाले होते. एकंदर बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक कधी होणार हे देवालाच माहीत. सरकारने महापालिकेच्या निवडणुका कशासाठी घेतल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Check Also
मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा
Spread the love बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) …