बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यापैकी फक्त 8 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. डॉ. जी. परमेश्वर, के.एच. मुनिअप्पा, के.जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगारेड्डी, जमीर अहमद हेही शपथ घेणार आहेत.
शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरामय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत.
आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी
काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचं प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिलं जात आहे.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीला
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, “कर्नाटकमधील लोकांच्या सरकारच्या शपथविधीपूर्वी एक बैठक.” तसेच सिद्धरामय्या यांनी दिल्लीत काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.
सिद्धरामय्या नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळुरूच्या श्री कंठीरवा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12:30 वाजता कंठीरवा स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. योग्य संयोजन असलेलं मंत्रिमंडळ, सर्व समुदाय, प्रदेश, गट यांचे प्रतिनिधी आणि जुन्या आणि नव्या पिढीतील आमदार यांच्यात समतोल राखणे, हे नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हान असेल.