म. ए. युवा समितीतर्फे निवेदन; प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार निवेदने
निपाणी (वार्ता) : तालुक्यातील ग्रामपंचायतीनी मराठी मातृभाषेतुन सर्व कागदपत्रे द्यावीत, या निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोहीम आखली आहे. अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता.२२) त्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीला हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, ग्रामपंचायतींना मराठी भाषेतून सर्व कागदपत्रे मिळावीत, यासाठी बंगळुर उच्चन्यालय, धारवाड खंडपीठ व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निर्णयानुसार निपाणी तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठी भाषेतुन मिळालीच पाहिजेत. संबंधित ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीमध्ये ही मागणी चर्चेसाठी घ्यावी. सर्वच ग्रामपंचायतींना निवेदने देण्यात येणार आहेत. कायदेशीर मार्गाने निवेदन देणे प्रत्येक भारतीय नागरिकांना अधिकार आहे. त्यानुसार निपाणी तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी सरकारी कागदपत्रे मराठी भाषेतून मिळावीत. याकामी भारतीय राज्यघटनेने हक्क आणि अधिकार दिले आहेत. आमच्या मागण्या कायदेशीर असतांना जर बेकायदेशीर ठरवत असाल, तर ही लोकशाही नव्हे, तर भारतीय राज्य घटना पायदळी तुडवल्यातला प्रकार आहे. कायद्या समोर सर्व समान आहेत. कायदा सर्वांना एकच आहे. म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने प्रत्येक सरकारी कार्यलयाकडून मराठी भाषिकांना कायदेशीर दृष्टीने पाहिले तर मातृभाषेतून सरकारी कागदपत्रे मिळालीच पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बंडा पाटील, सौरभ केसरकर, संग्राम पाटील, हिंदुराव मोरे, अमोल शेळके, संतोष निढोरे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.