बेळगाव : बेळगावात हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे बैलगाडी घेऊन प्रचंड आंदोलन केले आणि पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावातील शेतकऱ्यांनी हिडकल धरण आणि कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात अनेकदा संघर्ष करूनही पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई दिली नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने 396 एकर जमिनीची भरपाई देण्याचे आदेश दिले असतानाही अद्यापपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी बैलगाड्या घेऊन बेळगावात येऊन पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मास्तीहोळी गावचे शेतकरी नेते बाळेश मावनुरी यांनी सांगितले की, चारवेळा हायकोर्टाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश देऊनही पाटबंधारे खाते ती देण्यास टाळाटाळ करत आहे. मंत्र्यांनीही २८ फेब्रुवारी रोजी प्रभारी वरिष्ठांची परवानगी घेऊन प्रस्ताव सादर करू असे सांगितले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारले असून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय ते मागे घेणार नाही, आमच्या कुटुंबाला त्रास झाल्यास एम. डी. राजेश, बी. आर. राठोड हे मुख्य अधिकारीच जबाबदार असतील, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात हिडकल धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.