खानापूर : आषाढी एकादशीनिमित्त गावकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना वारकरी महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथे बुधवारी घडली आहे.
यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय 72) असे या वारकरी महिलेचे नाव आहे. गावातील वारकरी मंडळींच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये सदर महिला सहभागी होऊन टाळ वाजवत असतानाच सायंकाळी चार वाजता तिला हृदयविकाराचा धक्का बसला. यात तिचा मृत्यू झाला.
एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये सामील होऊन आपली सेवा करत असताना तिने आपला प्राण सोडला. यामुळे परिसरातील वारकरी संप्रदाय गहिवरला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज गुरुवारी दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रक्षाविसर्जन शुक्रवारी 19 रोजी सकाळी होणार आहे. खानापूर येथील तहसीलदार कार्यालयातील क्लर्क हणमंत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.