बेळगाव : खादरवाडी येथील जागेचा वादअखेर संपुष्टात आला. बक्कप्पाची वारी या 120 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून सदर जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावे झाल्याचे समजते.
मागील दीड वर्षपासून हा जागेचा वाद सुरू होता. शेतकऱ्यांनी जमीन परत मिळविण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती यासंदर्भात तहसीलदारांनी खादरवादी गावाला भेट देऊन गावकऱ्यांची मते जाणून घेतली होती आणि याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
न्यायालयीन लढा न देता शेतकऱ्यांनी रस्त्यावरची लढाई लढून अधिकाऱ्यांनी केलेल्या चूका दुरुस्त करून घेतल्या आहेत, असा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला.
खादरवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. त्यामुळे बेळगावात चाललेल्या हुकूमशाहीला मोठा धक्का बसला आहे. मात्र सदर 180 एकर जमिनिपैकी 40 एकर जमीन अद्याप लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या नावे असून एकूण 60 एकर जमिनींवर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू असून जोपर्यंत उर्वरित 60 एकर जमीन शेतकऱ्यांच्या नावे होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले.