नवी दिल्ली : तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती. एसआयटीने कुठपर्यंत तपास केला? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं असं ही न्यायालयाने म्हटले आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा असते. अहवाल जुलैमध्ये आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.
गुरुवारी पुन्हा सुनावणी
तुम्हीच अशी विधानं करत असाल तर मग तपासाची काय गरज ? असा सवाल कोर्टाने मुख्यमंत्र्यांना केला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने गठित केलेल्या एसआयटी मार्फत केला जाईल की अन्य दुसऱ्या एजन्सीकडे सोपवला जाईल. यावर न्यायालय गुरुवारी आपला आदेश देण्याची शक्यता आहे.