निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षात अनेक देवस्थानमध्ये यात्रा, जत्रा आणि उत्सवासाठी चांदीपासून बनविलेल्या पालख्यांचा वापर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी सराफ पेढीचे सुरेश शेट्टी आणि रवींद्र शेट्टी यांनी येडूर येथील वीरभद्र देवस्थान साठी तब्बल १५० किलो वजनाच्या चांदीची पालखी बनवली आहे. माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी येडूकडे रवाना झाली.
पालखीचे पूजन रवींद्र शेट्टी यांच्या हस्ते झाले. शास्त्रोक्त पद्धतीने या पालखीची निर्मिती केली आहे. त्यासाठी चार कारागीर सलग दोन महिने काम केले आहे. पालखीवर हत्ती, नंदीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. आतापर्यंत ५० किलो पासून १५० किलो पर्यंत चांदीच्या पालख्या केल्या आहेत. याशिवाय चांदीचा एक रथही येथे बनविण्यात आला आहे. देवस्थान कमिटीने पुरविलेल्या चांदीनुसार आकर्षक कलाकुसर करून कोळीगुड्ड, रायचूर जिल्ह्यातील मरूळी, अंकलीतील शिवालय, तोरणहळ्ळी हनुमान मंदिर, निपाणीतील महादेव मंदिर, गदग येथील शिवानंद मठातील सिंहासन, दावणगेरी वीरभद्र देवस्थान मधील प्रभावळसह इतर ठिकाणी चांदीच्या पालख्या करून दिल्याचे सुरेश शेट्टी यांनी सांगितले.