
बेळगाव : 2006 मध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात हजर राहण्यासाठी रामदास कदम सोमवारी बेळगावला आले होते.
2006 साली झालेल्या खानापूर मधल्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. कदम यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाने खानापूर येथील समितीच्या मेळाव्यात साडेतीनशे जणांच्या जमावाने केलेला पोलिसांवर हल्ला, सरकारी गाड्यांची मोडतोड केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आय पी सी 153 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याआधी कधीही तारखेला हजर झाले नव्हते. या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर समन्स बजावले होते. वॉरंट काढले होते अखेर खेड येथील त्यांच्या घरावर कोर्टाने मालमत्ता जप्तीचे नोटीस काढले होते. त्यानंतर त्यांच्या भावाने मुंबईत याची कल्पना त्यांना दिली. रामदास कदम सोमवारी 11 एप्रिल रोजी घटना झालेल्या तब्बल सोळा वर्षानंतर त्या खानापूरमधील कोर्टात हजर झाले आणि त्यांनी जामीन मिळवला.
बेळगावातील ज्येष्ठ वकील श्यामसुंदर पत्तार यांनी बेळगाव जिल्हा अकराव्या सत्र न्यायालयामध्ये रामदास कदम यांच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता काही जामीन मंजूर केला होता.
त्यानुसार सोमवारी त्यांना खानापूर कोर्टात हजर करून जामीन मिळवण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यासोबत होते. माजी महापौर शिवाजी सुंठकर, कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे, सचिन गोरले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta