
बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून बेळगावमध्ये मोठ्या उत्सहाने तयारी सुरू आहे. मात्र, शहरातील कसाई गल्ली परिसरातील दुरावस्था अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा पुरावा देत असून, महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतरही कोणतीही कृती न केल्याने संताप व्यक्त होत आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगावमधील कसाई गल्ली मार्गावरून भीमज्योतीची मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर कसाई गल्लीतील स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीत करण्यात आले होते. १३ एप्रिलपर्यंत या भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, जयंतीला केवळ तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप कोणतेही काम सुरू झाले नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील गटारींना सिमेंट काँक्रीटीकरण नसल्यामुळे सांडपाणी वाहून न जाता एकाच जागी साचून राहत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. इतकेच नाही तर रस्त्याच्या मधोमध कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाही स्वच्छता कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. स्वच्छतेच्या अभावामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी चिंता बाबू पुजारी यांनी व्यक्त केली. अत्यंत वैभवात निघणारी भीमज्योती मिरवणूक याच रस्त्यावरून जाणार आहे. मात्र, खड्डेमय रस्ते आणि साचलेले सांडपाणी यामुळे मिरवणुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घ्यावे, अन्यथा जयंतीच्या दिवशी दुर्गंधीयुक्त वातावरणातच मिरवणूक काढावी लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta