बेळगाव : शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन हाती घेतले असून शेतकरी विश्वासघाताचा सप्ताह या अंतर्गत छेडण्यात आलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. राज्यव्यापी आंदोलनात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन छेदत राज्यातील कृषी कायदे मागे घ्यावेत, बेळगावमधील खाजगी एपीएमसी रद्द करावी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा, यासह अनेक मागण्या मांडल्या आहेत. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, दक्षिण आमदार अभय पाटील यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी कोबी, दोडकी, टोमॅटो अशा विविध भाज्यांची विक्री करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटक सरकार शेतकरी, कर्मचारी, दलित, विद्यार्थी, महिला, युवक या साऱ्यांच्या विरोधातील धोरण राबवित आहे. सरकार कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. अल्पदरात कापसाची निर्यात करण्यात येत आहे. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आहे. शिवाय राज्यात शेतकरी विरोधी कायदे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत याबाबत संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. यावेळी चामरस माळी पाटील, सिद्दगौड मोदगी, पी. एच. पुजारी, बी. एस. उप्पीन, सतीश नाईक, रवी पाटील, रमेश पाली, संतोष एच. एम, शिवलेला मिसाळे, बी. व्ही. कुलकर्णी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.