बेळगाव (प्रतिनिधी) : येळ्ळुर येथे शेतकर्याच्या गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा होरपळून मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये काही शेती साहित्य सुद्धा जळून खाक झाले आहे. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेतकरी मुकुंद लक्ष्मण मुरकुटे यांनी दिवसभर शेतातील कामे आटोपून दुध काढुन जनावरांना गवत टाकुन झोपायला गेले होते. रात्री 11:30 च्या सुमारास शार्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली.
यामध्ये त्यांच्या मालकीच्या दोन्ही म्हशी दगावल्या असून एक म्हैस होरपळून गंभीर जखमी झाली. या आगीत गोठ्यात असलेले साहित्य, चारा, कुट्टी, शेती अवजारे, शेती लाकडी अवजारे जळून खाक झाले असुन नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच येळ्ळुर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील व सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेणसे, राजु डोण्याण्णावर यांनी पाहणी केली. त्यानंतर ताबडतोब शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तलाठी मयुर मासेकर व जनावराचे डॉक्टर मल्लापा रातण्णावर यांनी संपुर्ण घटनेची पंचनामा केला. शेतकर्याला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे येळ्ळुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta