बेळगाव : देशात मुस्लिम जिहादींकडून हिंसाचार माजवून हिंदूंवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करून, विहिंप, बजरंग दलाच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवेळी देशभरातील १०० हुन अधिक ठिकाणी मुस्लिम जिहादींनी हल्ला चढवून दगडफेक करून हिंसाचार माजविला आहे. मुस्लिम धर्माचा अवमान केल्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून देशभरात अशांतता माजविण्याचा येत आहे. कायद्यानुसार, लोकशाही मार्गाने आंदोलन न करता वारंवार हिंदू समाजावर हल्ले करून, दगडफेक करून लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदूंच्या मालमत्तांचे नुकसान, लुटालूट करणे, त्यांना आग लावणे अशी बेकायदा कृत्ये करण्यात येत आहेत.
आमच्या भगिनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या नावाखाली त्यांना व हिंदूंना जीवे मारण्याची धमकी देऊन हल्ले करणे, आमच्या श्रद्धेच्या देवदेवतांची विटंबना करणे असे प्रकार जिहादी करत आहेत. यावर तातडीने कथित कारवाई करून मुस्लिम जिहादींना पायबंद घालावा अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णा भट म्हणाले, भारतमाता सुरक्षित राहण्यासाठी देशात चाललेल्या चुकीच्या कृत्यांचा पक्षभेद विसरून निषेध केला पाहिजे. पोलिसांनी आम्हाला निदर्शने करू नका असे सांगितले होते. पण आम्ही या गैरप्रकारांविरोधात आंदोलन करत राहू. विहिंप आणि बजरंग दलाने कधीतरी या देशाच्या, देशाच्या कायद्याच्या विरोधात काम केले आहे का असा सवाल त्यांनी केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या निदर्शनात भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta