बेळगाव : तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. लाखो भारतीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली असून तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी तो पॉलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत राष्ट्रध्वजाबाबत घेतलेल्या नव्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अशोकभाई देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.
प्रारंभी मेणसे यांनी विषयाची मांडणी केली. त्यानंतर बोलताना देशपांडे यांनी तिरंगा ध्वजाच्या निर्मितीचा सविस्तर इतिहास सांगितला. हातात तिरंगा ध्वज घेऊन व वंदे मातरम् म्हणत लाखो लोकांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांनी इंग्रज पोलिसांचा लाठीमार सहन केला. असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागातून तिरंगा ध्वज निर्माण झाला. १९०५ पासून स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता मॅडम कामा, लोकमान्य टिळक आदीनी २२ वेळा सुचविलेल्या दुरुस्त्यानुसार तिरंगा ध्वज निर्माण झाला. त्याचा आकार कसा असावा तो कसा व केव्हा फडकवावा याचे काही नियम आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही धर्माचा आधार नाही. त्यातील केसरी रंग हा त्यागाचा पांढरा रंग शांततेचा व हिरवा रंग हा समृद्धीचा आहे. मधल्या भागातील चक्र हे प्रगतीचे प्रतिक आहे, असे त्यांनी सांगितले.
लेखक संघाचे मार्गदर्शक ऍड. नागेश सातेरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अशोकभाई देशपांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
बैठकीस कामगार नेते जी. व्ही. कुलकर्णी, प्रा. दत्ता नाडगौडा, कृष्णा शहापूरकर, शिवलिला मिसाळे, ऍड. अजय सातेरी, मधु पाटील, प्रा. अमित जडये, सुभाष कंग्राळकर, संदीप मुतगेकर किर्तीकुमार दोसी, सागर मरगाण्णाचे, गायत्री गोणबरे, दीपिका जाधव, शामल तुडयेकर, अर्जुन सागावकर, महेश राऊत, श्रीकांत कडोलकर आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
गिरीश काँप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात ही बैठक झाली.