
बेळगाव : शेतकरी आणि पशुपालकांच्या सोयीसाठी बेळगाव विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 87 सुसज्ज पशु संजीवनी रुग्णवाहिकांचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगाव सुवर्णसौध येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री प्रभू चव्हाण आणि गोविंद कारजोळ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि इतर अधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पशु संजीवनी रुग्णवाहिकांचा उद्घाटन पार पडले. एकूण 87 रुग्णवाहिकांमध्ये बेळगाव जिल्ह्यासाठी 17, गदगसाठी 8, हावेरीसाठी 9, धारवाडसाठी 8, बागलकोटसाठी 13, विजापूरसाठी 14 आणि उत्तर कन्नड जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, पूर्वी प्रत्येक शेतकर्याच्या घरी एक बैलजोडी असायची मात्र आज ती संस्कृती लोप पावत चालली आहे. आपण एकाच कुटुंबातून आलो असून आपल्या घरात आपण बैल चरताना पहिले असल्याचे ते म्हणाले. आज तशी परिस्थिती नसून बैल पाळताना अंगावर काटा येतो. आपल्या भूमीचा कस आणि सुपीकपणा वाढविण्यासाठी आपल्याला शेणखताची आवश्यकता अधिक असून आपण जोवर गुरे पळत नाही तोवर आपली संपत्ती वाढणार नसल्याचे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जमिनीची सुपीकता वाढविणारे कीटक आज रसायनांच्या वापरामुळे नष्ट होत चालले आहेत. रासायनिक खतांमुळे आपण आज कीटकनाशक औषधाचे प्रमाण अधिक असलेले अन्न खात आहोत. आज पिकविला जाणार्या पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर अधिक असून यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने सेंद्रिय शेतीकडे अधिक लक्ष वळविले असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, ज्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी आहे तिथे पशुवैद्यकीय अधिकार्यांची भरती स्वागतार्ह आहे. यापूर्वी असा प्रयत्न कुणी केला नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे आपण निःपक्षपातीपणे स्वागत आणि आदर करत असल्याचे मत हेब्बाळकरांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार, अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta