बेळगाव : बेळगावात दोन बालकांच्या अपघाती मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
बेळगावातील कॅम्प आणि फोर्ट रोडवर गेल्या दोन दिवसांत अवजड वाहनांच्या धडकेमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यालयात कॅम्प परिसरातील विद्यार्थी आणि पालकांची बैठक घेतली. असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले. तसेच शाळा सुरू होण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत मोठ्या वाहनांना शहरात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.
डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, आम्ही सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत कोणत्याही अवजड वाहनांना शहरात येण्यापासून रोखणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करत आहोत. आम्ही गट शिक्षणाधिकार्यांच्या माध्यमातून सर्व शाळांना माहिती देण्यास सांगितले आहे. फिशमार्केट आणि कॅम्प परिसरात सुमारे 15-20 शाळा आहेत. शाळांनी जबाबदारी घेऊन गार्ड नेमण्याबाबत कळविण्यात येईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही सर्व शक्य उपाययोजना करत आहोत. त्यासाठी तुम्ही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला रिझवान बेपारी, सुनील जाधव, शकील मुल्ला, संगोळी, किरण निपाणीकर, अरुणा गोजे-पाटील, नदीम फतेखान, इम्रान फतेखान आदींसह पालक उपस्थित होते. एकंदर दोन जीव गेल्याने बेळगाव पोलीस खडबडून जागे झाले. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.