बेळगाव : स्वातंत्र्योत्सवाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव पत्रकार संघाने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून श्रमदान केले व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचीच कामे रखडली आहेत. येथे खड्डे पडून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन बेळगाव पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आम्ही बातम्या लिहायलाही तयार आणि खड्डे बुजवायलाही तयार, असा इशारा पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाला दिला.
पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सिमेंट काँक्रेटचे रस्ते तसेच आंदोलनस्थळ उभारण्याचे नियोजन केले आहे. दोन महिन्यात यासाठी निविदा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विलास जोशी म्हणाले की, येथील रस्त्याकडे सर्वच माध्यमांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रतिकात्मकरीत्या आम्ही खड्डे भरून टाकत आहोत. सरकार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालक मंत्र्यांनी जागे होऊन येथील गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार केशव आदी म्हणाले की, आम्ही कोणत्याही अधिकारी किंवा विभागाच्या विरोधात नाही. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित करण्याचे काम आम्ही करत आहोत. बेळगावला स्मार्टसिटी म्हटले जाते, पण स्मार्टनेस कुठे आहे हे शोधावे लागेल. या रस्त्यावरून जिल्हाधिकारी, जि. पं. सीईओ आणि वरिष्ठ अधिकारी दररोज ये-जा करतात. मात्र या खड्डयांकडे कोणाचेच लक्ष नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी पत्रकार नौशाद विजापुरे, जगदीश विरक्तमठ, कीर्तिशेखर कासारगुडू, सुनीता देसाई, राजशेखरय्या हिरेमठ, सुनील पाटील, सुरेश नेर्ली, रवी गोसावी, शिवानंद कल्लुर, शिवराज, हिरामणी कंग्राळकर, विश्वा पाटील, लक्ष्मण आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta