बेळगाव : मराठा मंडळ बेळगाव या शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्षा सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ, मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा प्रशासकीय वर्ग, कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी भारताच्या तिरंग्याला मानवंदना दिली. त्यानंतर शांतीचे प्रतीक असणाऱ्या कबुतरांना मुक्त आकाशात सोडण्यात आले. कार्यक्रमाला उद्देशून संबोधित करताना भावी पिढीला आपल्या तिरंग्याची आण बाण आणि शान जपण्याचा कानमंत्र अध्यक्षांनी दिला. त्याचबरोबर एक सक्षम भारत उभा करण्यासाठी आपल्याला राष्ट्राने काय दिले यापेक्षा आपण राष्ट्रासाठी काय केले याची नेहमी चिंतन करा असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. डी. पाटील यांनी केले.
संध्याकाळच्या सत्रात ठीक ४.३० वाजता जवळपास 2000 विद्यार्थ्यांसमवेत सचित्र भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन राष्ट्रीय घोषणा व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. सचिव देखावे पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी जमली होती. ही रॅली मराठा मंडळ चव्हाट गल्लीपासून सुरू होऊन कित्तूर चन्नम्मा सर्कल ते धर्मवीर संभाजी चौक तेथून परत मराठा मंडळ येथे आली. ही रॅली मराठा मंडळाच्या कल्पक अध्यक्षा सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती.