बेळगाव : कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमावासीयाबरोबर असेल असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांनी काढले.
श्री. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सीमाभागातील मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने कोल्हापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते कोल्हापूरी फेटा, शाल, पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री. प्रकाश मरगाळे यांनी मुळीक यांचा गौरव करून सीमा लढ्याला बळ देण्याचे काम ते गेली अनेक वर्षे करीत असल्याचे सांगितले.
दरवर्षी 17 जानेवारीस कोल्हापूर बिंदू चौक येथे हुतात्मा दिनाचे ते आयोजन करतात. गेली अनेक वर्षे ते निपाणी व बेळगाव येथील आंदोलनात ते सहभागी असतात.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी मुळीक यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनातील कार्याचा गौरव करून मराठा समाज व विद्यार्थी यांच्यासाठी ते करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बेळगावचे महेश जुवेकर, बुलंद दीपक दळवी, विकास कलघटगी, महादेव मंगणाकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, इंद्रजित सावंत, कृष्णा भरगुडे व अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.