
बेळगाव : हलगा येथील प्रगतशील शेतकरी, होलसेल भाजी मार्केट विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते कै. श्री. यल्लाप्पा मष्णू सामजी यांचे शुक्रवार दिनांक ४ रोजी निधन झाले आज सोमवार दिनांक १४ रोजी त्यांचा अकरा दिवस त्यानिमित्त त्यांच्याबद्दल थोडेसे……….
आमचे तीर्थरूप ‘तत्वनिष्ठ बाबा’ म्हणजे अतिशय भारधस्त, सौज्वळ व मनमिळावू व्यक्तिमत्त्व. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांची राहणीमान साधी होती मात्र विचार आधुनिक होते. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कित्येक अशा व्यक्तींच्या जीवनाचे सोने करून त्यांच्या जीवनाला भरारी दिली. कर्म करावे पण फळाची अपेक्षा करू नये या उक्ती प्रमाणे अतिशय निर्मळ मनानें त्यांनी अनेकांना मार्गदर्शन करून त्याचा साधा उल्लेखही कधीच कोणा समोर केला नाही. गेल्या काही दिवसांत त्यांचे व्यापारी आप्तमित्र, पैपाहुणे व आप्तेष्ट यांच्याकडून अनुभव कथन करतांना आम्हांला जाणवले व मन भारावून आले.
बाबांच्या अंगी लहानपापासूनच दूरदृष्टीकोण होता. शेतकरी वर्गात आणि आजूबाजूच्या भागात त्यांचा नावाजलेले व मनमिळाऊ व्यापारी म्हणून खुप नावलौकिक होता. सर्व मुलींना उच्चशिक्षीत केले व मुलाला आपल्या व्यवसायामध्ये सामावून घेतले. वेळोवेळी सर्वांना शिक्षणाचे, वेळेचे व कष्टाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या जीवनप्रवासात त्यांना त्यांच्या सौभाग्यवतीची चांगली साथ मिळाली व त्याबद्दल ते सतत उल्लेखही करत असत.
हलगा गावांतील सामाजिक ऐक्य अखंड ठेवण्यात त्यांचा खुपमोठा हातखंडा होता. मंदिराचा जिर्णोद्धार करून आपली संस्कृती व परंपरा याचे जतन करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. हलगा येथील श्री ज्योतिबा व कालभैरव मंदिर गावकऱ्यांच्या मदतीने केवळ वर्षभरात पूर्ण केले.
दरवर्षी बैलगाडानें कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेचा प्रवास करताना, त्यांच्या गाड्याची लोक खुप कुतुहूलाने चौकशी करत. बाबांना बैलांची (बैलजोडीची) भारी आवड. वेळात वेळ काढून बैलजोडी बघून घेऊन येणं व त्यांची आपल्या पुत्रासमान लाड व जोपासना करणं हा त्यांचा आवडता छंद. बैलांच्या शर्यंती हल्ली म्हणाव्या तशा होत नाहीत तर त्या पुनः सुरू व्हाव्यात म्हणून शेवटच्या क्षणा पर्यंत अथक परिश्रम घेत राहिले.
बेळगाव जयकिसान भाजी मार्केटच्या उभारणीसाठी मोलाचा वाटा उचलला.
आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून धरावे व आपले संस्कार आपली परंपरा आपली माणसं यांचे हित जपावे हीच बाबांनी शेवटपर्यंत आम्हांला शिकवण दिली आणी स्वतःही त्याचे आचरण केले….
आमचे बाबा म्हणजे सकारात्मक उर्जेचा अखंड स्रोत होते. निर्णयक्षमता आणि प्रत्येक कार्याबद्दल त्यांच्यात नेहमीच स्पष्टपणा व वक्तशीरपणा होता. आज आम्हाला नेतृत्व व कौशल्य यांचे शिक्षण घेण्यासाठी अमाप पैसा खर्च करावा लागतो. पण ते स्वतःच एक संघटना व सकारात्मक दृढता या विचारांची संस्थाच होते. त्यांनी फक्त इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पण प्रक्रिया, वेळ व्यवस्थापन, कार्य व्यवस्थापन इत्यादींचे महत्त्व त्यांनी बालपणापासूनच जाणिले होते व स्वतः अंगीभूत केले होते. आम्हीहीं आजमितीस त्यांची ही शिकवण बालपणापासूनच अंमलात आणत आहोत व पुढेही परंपरेने त्यांच्या विचारांची अंमलबजावणी तत्परतेने करत राहु.
तुमच्या मुली
Belgaum Varta Belgaum Varta