बेळगाव : शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव, बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख व बळ्ळारी नाला समितीचे चेअरमन किर्तीकुमार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी बेळगावसह परिसरातील जवळपास 600 एकरहून अधिक जमीन पाण्याखाली जाऊन भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तेव्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेवुन बळ्ळारी नाल्याची सफाई करून तात्काळ काँक्रीटीकरण करावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. बळ्ळारी नाला हा 32 कि.मी. लांबीचा आहे. मात्र सध्या हा नाला जलपर्णी आणि झाडाझुडपानी व्यापला आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या बळ्ळारी नाला तुंबल्यामुळे नाल्याला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत तसेच परिसरातील विहिरी आणि कूपनलिका दूषित होत आहेत. त्यामुळे संबंधित खात्याने बळ्ळारी नाल्याचे प्रश्न लवकरात लवकर निकालात काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख अमोल देसाई, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, महेश जुवेकर, राजू मरवे, माधुरी बिर्जे, महादेव धामणेकर, गुरुराज शहापूरकर, मनोहर गडकरी, पांडुरंग पाटील, लक्ष्मण शिंदे, भाऊराव पाटील, रमेश हावळाणाचे, मोहन सालगुडी, नंदकुमार गडकरी, हिराचंद चौगुले, प्रभाकर पाटील, श्रीधर बिर्जे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.