बेळगाव : श्रीकृष्ण कथा महोत्सवातील पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या तीन विवाहांची माहिती दिली. कौशल देशाचा राजा नग्नजीत यांची कन्या सत्या जिला नग्नाजीती असेही म्हटले जायचे तिच्याबरोबर विवाह केला. ज्यावेळीला भगवान श्रीकृष्ण कौशल राज्यात गेले त्यावेळेला त्यावेळी नग्नजीत महाराज सत्या देवीचा विवाह अशा व्यक्तीबरोबर करणार होते की जी व्यक्ती त्यांच्या 7 बैलांना (सांड) वश करून नियंत्रण आणतील त्यांच्याशी सत्या विवाह करणार आहे. ही अट ऐकून तिथे आलेल्या अनेक राज्यानी प्रयत्न केला. पण ते सर्व त्या बैलांना वश करायला असमर्थ ठरले. तेव्हा श्रीकृष्णांनी आपले रूप सात रूपात विस्तारित केले आणि अगदी सहजरीत्या त्या 7 बैलांना वश केले. सत्यादेवीची ही इच्छा भगवंताबरोबरच विवाह करण्याची होती. त्यामुळे नग्नजीत महाराजांनी मोठ्या आनंदाने सत्याचा विवाह भगवंतांच्या बरोबर केला. त्यावेळी येथे आनंदोत्सव साजरा झाला. हजारो गाई, रथ, हत्ती, सेविका, धनधान्य, मौल्यवान उपहार देऊन नग्नजीत महाराजांनी आपल्या कन्येची आनंदाने बिदाई केली. अशाप्रकारे भगवंताची सहावी राणी म्हणून सत्या घरी आली. त्यानंतर शूतकीर्तीची कन्या भद्रा हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर लक्ष्मणा हिच्याबरोबर आठवा विवाह झाला. अशा प्रकारे एकूण आठ राण्यांशी विवाह करून भगवान श्रीकृष्णानी त्यांना मथूरेत आणले.
सहाव्या दिवशी कृष्ण कथानकाचा समारोप
यावर्षीच्या श्रीकृष्ण कथानाथाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या 16100 राण्यांबरोबर झालेल्या विवाहाची कथा सांगितली.भौमासुर म्हणजेच नरकासुर आणि मूर यांचे अनन्वित अत्याचार वाढले होते. भौमासुराने वेगवेगळे ऋषीमुनी, वेगवेगळ्या देवता, वेगवेगळ्या असूर आणि वेगवेगळ्या राजांच्या कन्या जबरदस्तीने आणून बंदीवासात ठेवल्या होत्या. त्यांची संख्या होती 16100. ज्या वेळेला श्रीकृष्णांना हे समजले तेव्हा त्यांनी नरकासुराबरोबर युद्ध केले आणि नरक चतुर्दशी दिवशी त्याचा वध केला. त्या 16100 राण्यांना त्यांनी द्वारकेला पाठवले. त्यांच्यासोबत प्रचंड धनदौलत सुद्धा त्यांना देण्यात आली. द्वारकेला येऊन भगवंतांनी एकाच वेळी एकाच मुहूर्तावर त्या 16100 राण्यांच्या बरोबर विवाह केला. त्यांच्यासोबत त्यांचा सर्व परिवार प्रत्येक ठिकाणी उपस्थित होता. प्रत्यक्ष रूपाने भगवान श्रीकृष्ण प्रत्येक राजमहालात होते आणि तेही त्यांच्या मूळ रूपात. ही आहे भगवंताची अद्भुत शक्ती. त्यांचे कार्य तर्क करण्यापलीकडचे आहे. भगवंत त्या प्रत्येक राणीसोबत प्रत्येक महालात अनेक वर्षे राहिले. साधारण मनुष्य प्रमाणेच त्यांनी तेथे व्यवहार केला. एक आदर्श गृहस्थ कसा राहू शकतो हे त्यांनी द्वारकेत राहून दाखवून दिले. अशा प्रकारे भगवंतांच्या 16,108 राण्या झाल्या असे सांगून भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंदातील 58 व्या अध्यायाची सांगता केली.यावर्षी भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाबाबतीतची माहिती ऐकून उपस्थित असलेले हजारो भक्तगण आनंदी झाले.
दरम्यान सत्यभामा राणीच्या इच्छेखातर त्यांनी स्वर्गातून पारिजात वृक्ष आणला तो आणण्यासाठी त्यांना इंद्राबरोबर युद्ध करावे लागले. त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला आणि तो पारिजात वृक्ष आणून भगवान श्रीकृष्णानी आपल्या पत्नीच्या महालासमोर लावला अशी ही माहिती महाराजांनी यावेळी दिली.