बेळगाव : झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता काम करू देणार नाही, असा इशारा देत रविवारी (दि. १५) बायपासचे काम शेतकऱ्यांनी पुन्हा बंद पाडले.
साक्षी, पुरावे तपासून झिरो पॉईंट निश्चित होणार आहे. आमचा खटला न्यायालयात सुरू असतानाही रस्ता काम करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्ता काम बंद पाडले. दाव्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीत मातीचा भराव टाकत असताना आज त्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला अडवत आमच्या जमिनीत भरावही टाकू नये व तिथून तुमची वाहनेही येऊ नयेत, असे ठणकावून सांगितल्याने तुमच्या जमिनीत काम करणार नाही, असे आश्वासन दिले.
मागील येळ्ळूर रोड आंदोलनात महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराला जाब विचारत झिरो पॉईंट निश्चित झालेले पुरावे, वर्क ऑर्डर, काम सुरु असलेल्या बायपासमधील किती शेतकऱ्यांनी भरपाई घेतली, काम सुरु करण्यासाठी तुमच्याकडे असलेली न्यायालय आदेशाची प्रत दाखवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यावेळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्व कागदपत्रे दिली जातील, असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. पण तेव्हापासून आजपर्यंत कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांना न देता ठेकेदाराने बायपासचे काम सुरुच ठेवले होते. त्यामुळे आज दाव्यात असलेल्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारला. दाव्याचा निकाल लागेपर्यंत आमच्या जमिनीत कोणतेच काम करायचे नाही किंवा ज्यांनी भरपाई घेतली नाही त्यांच्यातही काम करायचे नाही असा नियम आहे, असे ठणकावल्यानंतर काम बंद करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta