बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
बेळगुंदी : बालवीर विद्यानिकेतनच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवून एक अनोखा आणि प्रेरणादायक उपक्रम राबवला. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, पक्ष्यांसाठी पाणी आणि आहार मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरात येणारे पक्षी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत होते, ज्यामुळे त्यांना शाळेच्या परिसरात झाडांवर धान्य आणि पाणी ठेवण्याचा विचार आला.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी पक्षांसाठी पाणी आणि धान्य ठेवून माणुसकीचा हात पुढे केला. यामुळे पक्षांना पाणी आणि आहार मिळवण्यास मदत झाली आहे. या उपक्रमाला शाळेतील शिक्षकांद्वारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले. त्यात वर्गशिक्षक सिद्धेश्वर तुर्केवाडकर, राजु मुजावर, एस. एन. जाधव, गोविंद पाटील यांचा समावेश होता, तसेच प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापुरकर आणि माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांचे प्रोत्साहन देखील मिळाले.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजून घेतले आहे, आणि त्यांचे हे कार्य सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरले आहे.