
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नियंत्रणात असून, महाराष्ट्र्रातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या पूरसदृश स्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर २२१ घरांचे अंशतः आणि २ घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. १४० हेक्टर कृषी जमीन पुरामुळे बाधित झाली आहे, ज्यात ५.२५ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील हिडकल जलाशय ९०%, नविलतीर्थ जलाशय ७८% आणि मार्कंडेय जलाशय ९०% भरले आहेत. सध्या चिकोडी तालुक्यातील कलोळ बॅरेजमधून महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह ४० क्युसेक इतका आहे. २ लाख क्युसेक पाणी झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून पाणी सोडल्यास ते पाणी आपल्या जिल्ह्यातील नद्यांपर्यंत पोहोचायला सुमारे ४-५ दिवस लागतील. तसेच, आपल्या जिल्ह्यातून आलमट्टी धरणापर्यंत पाणी जाण्यासाठी ७ दिवस लागतील. महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून किती पाणी सोडले जात आहे, याची माहिती घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दररोज संपर्कात आहोत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta