बेळगाव : बेळगावातील सरकारी एपीएमसी वाचविण्यासाठी मी बेंगळूरहून आलो आहे. 45 दिवसांपासून शेतकरी–व्यापारी येथे आंदोलन करत आहेत. काय–काय झालेय याची पाहणी करण्यासाठी आलोय. पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नंतर बेंगळूरला मुख्य कार्यालयात जाऊन योग्य निर्णय घेणार आहे, असे आश्वासन एपीएमसी खात्याचे राज्य संचालक ए. एम. योगेश यांनी दिले.
बेळगावातील न्यू गांधीनगर येथे निर्माण केलेल्या खासगी एपीएमसीविरोधात शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी-व्यापाऱ्यांनी दंड थोपटले आहेत. खासगी भाजीमार्केट बंद करावे या मागणीसाठी त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज, रविवारी 45 दिवस पूर्ण झाले. रविवारी एपीएमसी राज्य संचालक ए. एम. योगेश यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी-व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सिदगौडा मोदगी यांनी त्यांना खासगी भाजीमार्केट बेकायदेशीररीत्या कसे उभे केले याबाबत संपूर्ण माहिती दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एपीएमसी राज्य संचालक ए. एम. योगेश म्हणाले, मी अधिकारसूत्रे स्वीकारून उद्या १ महिना पूर्ण होईल. येथून आलेल्या एका शिष्टमंडळाने मला भेटून माझ्याशी एक तास चर्चा केली आहे. आज मी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली आहे. येथे काय-काय झालेय याची माहिती घेत आहे. ही एपीएमसी वाचविण्यासाठी मी बेंगळूरहून येथे आलो आहे. कायद्यानुसार जी पावले उचलता येतील ती सर्व उचलण्यात येतील. शेतकरी-व्यापाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. एकट्याच्या पातळीवर निर्णय घेता येईल असे हे प्रकरण नाही. मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन, काय चुका झाल्या आहेत हे निदर्शनास आणून त्या कशा दुरुस्त करता येतील हे पाहू. पुढील काळात बेळगाव एपीएमसीचा आणखी विकास कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असे योगेश यांनी सांगितले.
यावेळी एपीएमसी उपसंचालक महांतेश पाटील, सचिव गुरुप्रसाद, कार्यकारी अधिकारी हमाली, संजीव सिद्रामणी, एपीएमसीचे माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील, व्यापारी बसनगौडा पाटील, सतीश पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी-व्यापारी उपस्थित होते.
