

बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी ‘काळा दिना’च्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या निषेध फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमासमन्वयक मंत्र्यांना बेळगावात पाठविण्यात यावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भाषावर प्रांतरचना करताना सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाविरोधात समितीतर्फे १९५६ पासून एक नोव्हेंबर रोजी निषेध फेरी काढली जाते. तसेच, फेरीमध्ये हजारो मराठी भाषिक सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याची इच्छा दाखवून देत असतात. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासह प्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी. यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक केली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या निषेध फेरीत सहभागी होऊन मराठी भाषकांना पाठबळ द्यावे, अशी मागणी समितीतर्फे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
निषेध फेरीमध्ये सहभागी होऊन समन्वयक मंत्र्यांनी मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभे असल्याचा संदेश देणे गरजेचे आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी व मंत्र्यांनी भाग घेतला आहे. त्यामुळे देसाई व पाटील यांनीही बेळगावात उपस्थित राहून मराठी भाषकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होऊ लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta