

बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिनी” फेरी काढण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. 1 नोव्हेंबर रोजी धर्मवीर संभाजी उद्यानातून मूक सायकल फेरीला सुरुवात होईल. सकाळी साडेनऊ वाजता मराठी भाषिकांनी प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता या फेरीत सामील व्हावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात हा काळा दिन सुतक दिन म्हणून सीमा भागात पाळण्यात येतो. जोपर्यंत मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या भूमीत महाराष्ट्रात सामील केलं जात नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असे यावेळी प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले.
1 नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्रातील समन्वय मंत्र्यांनी बेळगावात उपस्थित रहावे अशी मागणी करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेण्याची मागणी मध्यवर्तीच्या सदस्यांनी केली. करवेच्या नारायणगौडा केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचा बैठकीदरम्यान निषेध करण्यात आला. करवेने केलेल्या वक्तव्याला भीक न घालता मराठी भाषिकांनी काळ्या दिनी मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. 1956 पासून मराठी भाषिकांनी हा लढा जिवंत ठेवला आहे. रणांगणातून पळ काढणे ही मराठ्यांची जात नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी ऍड. अमर येळ्ळूरकर, नेताजी जाधव, श्रीकांत कदम, राजू बिर्जे, रणजित हावळणाचे, सागर पाटील, अनिल अंबरोळे, रणजित चव्हाण पाटील आदींनी आपले विचार मांडले.
बैठकीला रमाकांत कोंडुसकर, विकास कलगटगी, शिवराज पाटील, मदन बामणे, अंकुश केसरकर, उमेश पाटील, बाबू कोले, नितीन खन्नुकर, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta