
बेळगाव : भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक नोव्हेंबर 1956 मध्ये भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना झाली याच दिवशी पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव कारवार आणि हैदराबाद मधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश त्या वेळेच्या म्हैसूर राज्यात घालण्याची शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने जाहीर केली होती. मराठी भाषिकावर झालेला हा अन्याय दूर करून घेण्यासाठी अनेक आंदोलने झाली. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात गोळीबार झाला यात चौघांना हौतात्म्य प्राप्त झाले. निपाणीत कमळाबाई मोहिते हुतात्मा झाल्या त्यानंतर झालेल्या सत्याग्रहात हजारो सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला. या अन्यायाविरुद्ध दाद मागूनही केंद्र सरकारने मराठी भाषिक प्रदेश म्हैसूर राज्यात घातला केंद्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध एक नोव्हेंबर 1956 रोजी काळा दिन पाळण्यात आला. त्या दिवसापासून आतापर्यंत एक नोव्हेंबरला केंद्र सरकार विरुद्ध काळा दिवस पाळण्याची परंपरा सीमा भागात चालू आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमाभागात काळ्या दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बेळगावमध्ये सायकल फेरीचे व सभेचे आयोजन करण्यात आले असून सायकल फेरीची सुरुवात संभाजी उद्यान येथून सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. सायकल फेरी नेहमीच्या मार्गाने फिरून मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमात बेळगाव व बेळगाव तालुक्यातील जनता, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगाव शहर व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta