
बेळगाव : “शेतकऱ्यांच्या समस्या वेदनादायी आहेत. त्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका. पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या समर्थनात उभे राहणे, गरजेचे आहे,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले.
विजयेंद्र यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सरकारवर सडाडून टीका केली. ‘सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा आणि योग्य निर्णय घ्यावेत. सरकारने कसे वागावे हे सरकारने समजून घेतले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
“मी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावला आलो आहे. मला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. जेव्हा याच बेळगावमध्ये विठ्ठल अरबावी या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आंदोलन सुरू केले होते आणि उसाला प्रति टन 150 रुपये अतिरिक्त भाव दिला होता. भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे,” असेही विजयेंद्र म्हणाले.
“राज्यात दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष टन ऊसाचे उत्पादन होते. आणि त्यातून सरकारला 50 ते 60 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत न देणे हे राज्य सरकारचे अपयश आहे,” असेही विजयेंद्र म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि भाजप जिल्हा नेते तसेच आजी-माजी आमदार याप्रसंगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta