बेळगाव : डीसीसी बँक कर्मचाऱ्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्याने भाजपने काँग्रेस सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. सवदी समर्थकांवर गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांनी सरकारचे बाहुले बनू नये, असा इशारा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या मुलाने आणि समर्थकांनी डीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. राज्यातील पोलीस ठाणी आता काँग्रेसची कार्यालये बनली असून पोलीस पूर्णपणे राज्य सरकारचे बाहुले झाले आहेत, असा गंभीर आरोप भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला.
राज्यात काँग्रेसची गुंडगिरी वाढली असून बेळगाव आणि अथणीतील घटना त्याचे पुरावे आहेत, अशी टीका माजी आमदार संजय पाटील यांनी केली. कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून सवदी यांच्या मुलावर गुन्हा असूनही पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार ‘६० टक्के’ कमिशन घेणारे असून दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला
पत्रकार परिषदेला रमेश देशपांडे, सचिन कडी, ईरय्या खोत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta