बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. तालुक्याच्या उत्तर भागासह पूर्व भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
तालुक्याच्या इतर भागात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. अगसगे, हंदिगनूर, चलवेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी या गावांमध्ये ज्वारी पिकावर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. बहरात असलेली ज्वारी भुईसपाट झाल्याने उत्पादन हातचे गेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यंदा खरीप हंगामात समाधानकारक आणि माफक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागात ज्वारीचे पीक चांगले बहरले होते. उत्पादन वाढणार, काहीतरी हातात पडणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बांधली होती. ज्वारी पीक ऐन बहरात असताना अनपेक्षितपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta