मुंबई, बेळगाव, कारवार, बिदर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १९५५ साल च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई मराठी भाषिकांनी तीव्र आंदोलन केले यात १०५ जणांना हौतात्म्य आले तरीदेखील तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी फाझल आली आयोगाच्या शिफारशी स्वीकारून १६ जानेवारी १९५६ रोजी नभोवाणी वरून विदर्भासह महाराष्ट्र, गुजरात तर मुंबई केंद्रशासित केली तर बेळगाव कारवार, बिदर, धारवाड हे जिल्हे तेव्हाच्या म्हैसूर राज्यात डांबले गेले.
म. ए. समितीने म्हैसूर राज्यात डांबल्याच्या निषेधार्थ १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव बंद करून केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
१७ जानेवारी रोजी सकाळ पासूनच मराठी भाषिक तरुण रस्त्यावर उतरले होते. जनतेच्या भावना संतप्त होत्या, त्यांना आवरणे कठीण झाले होते. त्यावेळी हा भाग अजूनही मुंबई प्रांतात होता आणि त्याचे मुख्यमंत्री होते मुरारजी देसाई आणि ते नेहमीच मराठी भाषिकांच्या विरोधात असायचे हा इतिहास होता. मराठी लोकांचा प्रखर विरोध पाहता, त्यादिवशी दुपार नंतर बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांनी गोळीबार सुरु केला. गोळीबारात प्रथम हौतात्म्य आले ते कंग्राळीचे पैलवान मारुती बेन्नाळकर यांना त्यानंतर महादेव बारागडी, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे हे धारातीर्थी पडले. म्हात्रु मंडोळकर या तरुणाच्या पायातून गोळी गेल्यामुळे तो आयुष्यभरासाठी अपंग झाला, तर त्याचवेळी निपाणी येथे कमळाबाई मोहिते या महिला हुतात्मा झाल्या. फाजल अली कमिशनच्या शिफारसी लागू झाल्यानंतरचा हा पहिला लढा आणि हुतात्मा पै. मारुती बेन्नाळकर याना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिला हुतात्मा असे म्हटले जाते.
सीमालढ्यात मराठी मातीसाठी, हा सीमाप्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सर्व त्यागमूर्तींना कोटी कोटी नमन..
© *महाराष्ट्र एकीकरण समिती*
Belgaum Varta Belgaum Varta